आयुष्य अन् मी
माणसाचं मन म्हणजे खूप मोठा गुंता आहे...सोडवायचा जितका प्रयत्न कराल तितका तो वाढत जातो...गुंता वाढतो मग माणसांमधले बंधही सैल होतात कायमचेच...तो गुंता ' प्रेम ' , ' विश्वास ' , ' सोबत ' याबरोबरच ' तिरस्कार ' , ' विश्वासघात ' आणि ' विरह ' यांनी भरलेला असतो...! कसा सोडवायचा म्हटलं तर मन कैक विचारांनी सुन्न होतं...!! त्या विचारांना शंकेची पाल लागते आणि सकारात्मकता निघून जाते आणि गुंता सोडवून नात्याचे बंध पुन्हा जुळवण्याची शाश्वती देणेही कठीण होऊन जाते ! असं म्हणतात की , 'माणसे' ही आपली 'संपत्ती' असते पण स्थावर संपत्तीसाठी माणसं तुटताना पाहिली की , त्यावरचा विश्वासच उडतो...! शेवटी जे समोर येतं ते 'स्वीकारणे' अन्यथा त्यावर 'मात करणे' हे दोनच पर्याय उरतात आणि मानवी स्वभावधर्मानुसार माणूस 'मात करतो'...त्यामध्ये प्रेमाची मशागत केलेला तसेच 'विश्वासाच्या' आणि 'आपलेपणाच्या' दोन खुंटयांवर बांधलेला नात्यांचा पूल नकळत तुटून जातो...
जे आहे ते स्वीकारणारे फार कमी आहेत... माणसं मात्रं कशी विखुरतात नाही...! कधी काळी एकमेकांसाठी जीव द्यायला तयार असणारे ; काही काळानंतर एकमेकांचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत... पूर्णतः नात्याला आपलंसं मानणारेच पुढे जाऊन त्या नात्याची लक्तरे ' कोर्ट ' , ' पंचायती'च्या निवाड्यात लटकवतात ; तेव्हा खरंच प्रश्न पडतो की , यार याचा शेवट कोर्टात होता तर मग सुरुवात गोकुळात का आणि कशी ?? मग अशा नात्यांचं आयुष्य म्हणजे म्हणजे गोकुळ ते कोर्ट व्हाया 'वादविवाद' असंच असतं का ??
आजकाल ना चार चिमण्या एकत्र पाहायला मिळत नाहीत , मग माणसं कशी एकत्र राहतील !! " सूर एकत्र आले की गाणं बनून जातं , मनही सुरांसारखं असतं तर कितीतरी मनं एकत्र येऊन माणसं बांधली गेली असती..." शेवटी माणसं माणसांमध्ये , आपुलकी आपल्यांमध्ये , भांडण वाद-विवाद हक्काच्या माणसांसोबत आणि नात्यांमध्ये काळजी प्रेमामुळेच असते...!!! तेच प्रेम जपूया ; कारण विस्कळीत थव्यापेक्षा एका सुरेख रेषेत उडणारा थवाच अधिक सूंदर दिसतो...! मग प्रत्येकालाच वाटेल #भारी आहे हे 'आयुष्य अन् मी' ...!!
