आज सकाळी एका बागेत गेल्यावर तिथे बालपणीची एक आठवण आठवली. बालपण म्हटलं की कोकण डोळ्यासमोर तरळत राहतं. शाळेची वाट म्हणजे अस्सल पायवाट होती. आजूबाजूला भले मोठे फार पूर्वीचे वृक्ष , एखाद-दुसरा जनावरांचा गोठा , कोकण म्हटलं की एक गोष्ट सुटत नाही ती म्हणजे नारळाचं झाड , काळ्या मिरीच्या उंचच उंच वेली , घरगुती लिंबाची झाडं , कुंपण घालून केलेली भाज्यांची मशागत आणि चारही बाजूने उतार असलेली ती सुंदर कौलारू घरं ; असं सारं काही त्या वाटेत होतं. वाडीचा रस्ता सोडून वेगळ्याच दिशेला शाळेची इमारत होती. सुरुवातीला चिऱ्याच्या 4-5 अपुऱ्या पायऱ्या आणि दगड गोटे , तिथून थोडं पुढं आल्यावर डाव्या बाजूला वळून सऱ्या ताईच्या अंगणातून मातीने मळलेली वाट पुढे जायची , मग उजव्या बाजूला सद्या आबांचा गोठा होता , तिथून पुढे गेल्याव...