प्रदीप खेलूरकर (सेक्रेटरी, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, वर्धा)
तो शिबिराचा पहिला दिवस होता , शांत , संयमी शब्दांत त्यांनी जे जे काही मांडलं ते ते सर्व आजही मनात रुतून बसलंय. माणसं येतात आणि जातात पण प्रदीप सर गेलेले नाहीयेत. ते आपल्यातंच आहेत.
दररोज संध्याकाळी 6 वाजता सेवाग्राम आश्रमात होणाऱ्या प्रार्थनेला सर 'बा' कुटीच्या बाहेर बसलेले आजही डोळ्यांसमोर दिसतात. सरांची वाक्यं , तो स्थितप्रज्ञ चेहरा आणि चेहऱ्यावरचं स्मित ; कैक गोष्टी सांगून जायचं.
त्या दिवशी आशाबेन (अध्यक्षा, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान) दिल्लीला जाणार होत्या म्हणून मी आशाबेन यांना काहीतरी लिहून द्या असं म्हणाले होते तेव्हा विचार आला ; प्रदीप सर इथेच आहेत त्यांना निवांत भेटता येईल , छान गप्पा होतील ,आयुष्यभरासाठी काहीतरी घेऊन जाता येईल. पण तो क्षण पुन्हा कधीच येणार नाहीये याची कल्पनाही केली नव्हती.
शिबिरातील एखाद्या सत्रात सर अचानक मधेच येऊन शांतपणे कोणाला कळणार ही नाही अशा अंदाजाने येऊन बसत. त्यांच्या अनुभवांवरून आम्हाला बरंच काही सांगून जात.
प्राथनेवेळेचा सरांचा चेहरा... मार्गदर्शन करतानाचे सर... आणि सरांचं आयुष्य सारं काही एक मोठं पुस्तक आहे जे मला आयुष्यभर अभ्यासायचं आहे.
शिवाजी विद्यापीठात किशोर बेडकिहाळ सरांना भेटले तेव्हा त्यांनीही प्रदीप माझा चांगला मित्र आहे असं म्हणत आठवण काढली होती.
सर, तुम्हाला पाठवायचं पत्र राहून गेलं ही बाब मला आयुष्यभर दुःख देईल.
हे मला खरंच सहन होत नाहीये. आज दोन दिवस होतायंत पण तरीही हे जे काही झालं ते स्वीकारणं फार जड जातंय. सर तुम्ही शरीराने आमच्या सोबत नाही आहात आणि ही पोकळी कधीही भरून निघणार नाही. सर्वोदयाच्या वाटेवरून जाताना क्षणोक्षणी तुमची आठवण येईल.
~ शामल दीपा
(भाग १)
